संजीव देशपांडे, रविवार, २५ मार्च २०१२ अगदी आकाशाचाच मंडप आणि पृथ्वीचं या सर्वप्रसवा सर्जनशील भूमीचं आसन ज्याला लाभतं, तो एकटा कसा? तो तर विश्वव्यापी, पण अशी विश्वव्यापकता आणि सार्वभौमता सर्वाच्याच वाटय़ाला येत नाही. दगडांचाच विचार केला तर कोणाची बनते प्रतिमा मनोहारी, तर कोणी पायरीचा मानकरी, पण हे सर्व मंदिर नांदतं असतानाच. जेव्हा मंदिर नांदतं असतं तेव्हाच कदाचित लिहिला जात असावा त्याचा ललाटलेख आणि मग त्या ललाटलेखाचं अवलंबनाचं कार्य अगदी चोखपणे वर्तमान बजावतो. दगडांच्या सुंदर, सुरेल, लयबद्ध, नक्षीवंत, श्रीमंत प्रतिमांपुढे हा वर्तमान सतत उभा राहून त्यांना त्यांचं भवितव्य सततच दाखवून भेडसावत असतो, पण काही दगड म्हणजे त्या दगडांच्या मूर्ती, मात्र त्याचा हा आग्रह मोडून काढतात, शह देतात वर्तमानाला, म्हणजे प्रत्यक्ष काळालाच आणि काळही मग त्याच्या वाटेला जात नाही. तरीही या दगडांच्या प्रतिमा मात्र शिकार ठरतातच काळाच्या नाही तर निष्काळजीपणाच्या. अशीच एक प्रतिमा बलरामाची! अत्यंत दुर्मिळ, पण दिसते आता बिचारी केविलवाणी घोट-निंबाळा या गावातल्या मंदिरात. मंदिर कसलं ते?ग्रामस्थ सोमदेवाचं-सोमेश्वराचं मंदिर म्हणतात त्याला, पण मंदिर म्हणून आज काहीच शिल्लक नाही. चार-पाच दुर्मिळ प्रतिमा आणि इतस्तत: विखुरलेले अत्यंत नक्षीवंत दगड. हे घोट-निंबाळा म्हणजे खरं तर जोड गावं. अगदी हाकेच्या नाही तर हाताच्याच अंतरावर. हे सोमेश्वर मंदिर मात्र निंबाळा गावात. चंद्रपुरातून नागपूरला जावयाच्या मार्गावर थोडय़ा म्हणजे सुमारे सोळा सतरा किलोमीटर अंतरावर रस्त्यावरच वसलेलं घोडपेठ नावाचं गाव आहे. गावात उजव्या हाताच्या दिशेनं एक रस्ता जातो तो सरळ निंबाळा गावात पोहोचतो. चंद्रपूर-नागपूर मार्गानं सरळ गेलं तर घोडपेठच्या पुढं एक घोट-निंबाळा जाणारा फाटा येतो. या कच्च्या रस्त्यानं घोटमध्ये पोहोचता येतं आणि पुढे चार पावलांवर निंबाळा. निंबाळा गावात गेल्यावर सोमदेव किंवा सोमेश्वराचं मंदिर कुठे आहे, हे विचारावंच लागत नाही. गावच्या शाळेला अगदी लागूनच समोर हे मंदिर आहे. मंदिराची जी कल्पना डोक्यात असते त्याला हे सोमेश्वराचं मंदिर मात्र छेद देतं. इथं अगदी 'आकाश मंडप, पृथ्वी आसन' अशीच स्थिती आहे. गर्भगृह मंदिराचं तेवढं शिल्लक आहे. हे गर्भगृहसुद्धा बरंच मोठं आहे. गर्भगृहाच्या तीनही भिंतींना लागून प्रतिमांसाठीच्या जागा म्हणजे पीठं अजूनही दिसतात. सोमदेव-सोमेश्वराशिवाय एक दुर्मिळ अशी भैरव प्रतिमा गर्भगृहात आढळते. खरं तर, हे मंदिर म्हणजे एक देखणं वैभव आहे. आज त्या संपूर्ण परिसरात उगवलेल्या झाडाझुडपातून जेव्हा या मंदिराचे अवशेष दिसतात, त्यावरून हे लक्षात येतं की, हे मंदिर किती भव्य असेल. आज जे अवशेष दिसतात तेच एवढे नक्षीवंत आहेत की जेव्हा नांदतं असेल मंदिर तेव्हा किती दिमाखात मिरवत असतील मंदिराचे हे सर्व भाग, जे आज भग्न आणि असहाय होऊन पडलेत या परिसरात. आठवत असेल का त्यांना तो काळ, ते वैभव जे अनुभवलं असेल त्यांनी दहाव्या अकराव्या शतकात. एक तर हे गाव भद्रावती नगरीच्या अगदी जवळ. घोडपेठ, सुमठाणा, भद्रावती, भटाळा या गावात पुरावशेष तर आहेतच, पण मूर्तीशास्त्राच्या दृष्टीनं अत्यंत अभ्यासनीय अशा दुर्मिळ मूर्ती, जसे कुबेर प्रतिमा, केवलनृसिंह प्रतिमा, हरिहर प्रतिमा, अशा अनेक प्रतिमा अक्षरश: विखुरलेल्या आहेत. ज्यांची जागा पीठावर अत्यंत सन्मानाची असावी अशा प्रतिमा आज मातीत पडल्या आहेत. एखादी प्रतिमा जशी भद्रावती-देऊरवाडा मार्गावरच्या भवानी मंदिरापुढे पडलेली गजलक्ष्मी, अशा प्रतिमांपर्यंत जे या एवढय़ा शतकात दुर्लक्षतेचं रान पसरलंय आणि अनास्थेची झुडुपं वाढलीयत त्यामुळे इच्छा असूनही जाता येत नाही. मग हे धन असंच पडून राहतं उघडय़ावर ऊन-वारा आणि पाऊस झेलत, शेवटच्या दिवसांची वाट पाहत आणि आम्ही हेच विसरतो की, दगडांच्याच या प्रतिमा दुवा आहेत, त्या काळातला आणि आमच्यातल्या. तरीही त्यांच्या नशिबी एकांतच. सोमेश्वर मंदिराला भिंती नाहीत. गर्भगृहाची जागा आहे. दोन-तीन पायऱ्या उतरून जावं लागतं खाली, पण मंदिर भव्य असावं, असं या गर्भगृहावरून सहज लक्षात येतं. गर्भगृहापुढे सभामंडप असावा, तोही भव्यच, पण आज फक्त त्याच्या खुणाच उरल्या आहेत. सहा आठ खांब-स्तंभ कसंतरी जीवाच्या करारानं सांभाळत आहेत वरच्या तुळया. गर्भगृह आणि हे काही तग धरून राहिलेले स्तंभ यातलं अंतर पाहिलं की, ज्यावेळी मंदिर नांदतं असेल त्यावेळी या मंदिराची भव्यता किती असेल, याचा सहज अंदाज येतो. तीनही बाजूंनी सिमेंटची बांधकामं आणि एका बाजूनं डांबरी रस्ता असला तरीही आणि प्रचंड झुडुपात-कचऱ्यात हे अवशेष लपलेले असतील तरीही इथल्या कोणत्याही दगडाला हात लावला तर तो स्पर्श शतकं ओलांडणारा ठरतो, एवढं मात्र निश्चित. या परिसरात कुठंही न आढळणाऱ्या प्रतिमा या मंदिरात दिसतात, जसं भैरव प्रतिमा किंवा सप्तमातृकांचा शिल्पपट. हा शिल्पपट अत्यंत मनोहारी आहे, पण त्यालाही मधोमध तडा गेलाय आणि या भग्नतेनंसुद्धा त्या शिल्पपटाची लय भंगत नाही, हे विशेष. याच मंदिरातली आणखी एक विशेष आणि अत्यंत दुर्मिळ प्रतिमा म्हणजे बलरामाची प्रतिमा. ही प्रतिमा उघडय़ावरच पडली असून हिच्या सभोवार अनेक झुडुपं उगवली आहेत हात आणि कमरेचा भाग या मोकळ्या जागेतूनही. मूर्तीला कमरेखालचा भाग नाही. मूर्ती पाहताना, तिची लक्षणं अभ्यासताना असं लक्षात येतं की, ही मूर्ती दहाव्या-अकराव्या शतकातली असावी. बलराम हा शेषाचा अवतार मानला जातो म्हणून त्याच्या मस्तकावर फणा किंवा सर्पटोप असतो, जो या प्रतिमेत स्पष्ट दिसतो. चार हात असलेल्या या प्रतिमेचे चारही हात खंडित, भग्न झाले आहेत. या अशा सर्वच भग्नतेसह सुद्धा जी प्रतिमा आज आहे तिची रेखिवता अपूर्व आहे. डोळ्यांची ठेवण, अंगावरील अलंकार अगदी ठसठशीत आणि सौंदर्यपूर्ण आहेत, पण ही प्रतिमा एकटी आहे. एवढं देखणं वैभव एकटं काटय़ाकुटय़ात एकेक दिवस काढत आहे. ही एकटेपणाची शिक्षा म्हणायची का? असेल तर राजरोसपणे समाजात राहणारे आम्ही-आपण कोणत्या गुन्ह्य़ासाठी ही शिक्षा त्या दुर्मिळ बलरामाच्या प्रतिमेला देतो आहोत? आणि कुठलाही प्रतिवाद न करता ती प्रतिमा तो एकटेपणा सहन करते आहे. त्या बलराम प्रतिमेचं महत्त्व न ओळखणारे आपण गुन्हेगार की वाटय़ाला आलेलं एकटेपणही देखणं करून सोडणारी ती बलराम प्रतिमा भाग्यवान?
अधिक माहितीसाठी: http://m.newshunt.com/Loksatta/Vidharbh/13690077
No comments:
Post a Comment